सुगंध आणि शहरे
सुगंध आणि शहरे
श्रोत्रं चक्षु: स्पर्शनं च रसनं
घ्राणमेव च |
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ||
(Using the sense perceptions of the ears, eyes, skin, tongue,
and nose, which are grouped around the mind, the embodied soul savours the
objects of the senses.)
वरील श्लोकात
म्हटल्याप्रमाणे, आपली ज्ञांनेंद्रिये आपल्या बर्याचश्या आठवणी संचित
करण्यासाठी नक्कीच कारणीभूत असतात, मग लहानपणी, घराबाहेर असलेल्या पेरुच्या,
चिंचेच्या झाडाचा सुगंध असो किवा मोठेपणी, कॉलेज च्या कॅंटीन मधला तळलेला चायनिजचा
सुगंध असो, प्रत्येक सुगंध, स्वतःबरोबर, एक तरी आठवणींचा घोळका जमा करतोच! तसं
बघायला गेलं तर, माणूस म्हणजे तरी काय? आठवणींचा जमा केलेला एक मोठ्ठा घोळकाच, आणि
जर ह्या आठवणीच नसतील तर, नावापुरता काम करणारा यांत्रिक रोबोटच तो...पण मग, गंध
आणि त्यासोबत साठवल्या गेलेल्या आठवणी, म्हणजे त्या व्यक्तीची ओळख असं म्हटलं गेलं
तर ते कोणत्याही अंगाने चुकीचं ठरणार नाही. जितके जास्त गंध स्मरणात साठवलेले,
तितक्याच चांगल्या आणि वाईट आठवणींची शिदोरी जास्त मोठी!
फक्त आठवणीच नव्हे तर या वेगवेगळ्या गांधांचा आपल्या कल्पनाशक्तीवरही इतका जास्त प्रभाव जाणवतो की विचारूच नका, माशांचा तीव्र गंध आला की लग्गेच एखाद्या मोठ्ठ्या मच्छिमार्केटचं चित्र डोक्यात तयार होतं, एखाद्या ओळखीच्या आगरबत्तीचा दरवळ आला की नुकत्याच भेट दिलेल्या एखाद्या मंदिराची कल्पना डोक्यात तयार होते, आणि कधी काहीतरी खमंग तळल्याचा सुगंध आला तर थेट एखाद्या आवडत्या रेस्तराँ ची किवा मग थेट घरचे दृश्य डोळ्यासमोर उभे रहाते. ओल्या गवताचा किवा मातीचा हे गंध कधी प्रिय (pleasant) तर कधी अप्रिय (unpleasant) असतात आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी ही तशाच होऊन जातात. हे सगळं वाचताना वरील प्रत्येक ठिकाणाची कल्पना तुम्ही नक्की उभी केली असणारच...आणि जर असं असेल तर गंध हा प्रत्येक स्थळाच्या ओळखीचा एक भाग असतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणाबद्दलची आपली दृश्याव्यतिरिक्त समज, ही त्या ठिकाणच्या गंधामुळे आपल्यासोबत कायम साठवली जाते, याच कल्पनेला थोड्या अजून interesting ढंगात मांडायचा म्हणजे –‘शहरांची गंधात्मक ओळख’.
जगात अशी अनेक
शहरे आहेत ज्यांचे गंध ही त्यांची ओळख आहे आणि भारत म्हणजे अशा वेगवेगळ्या
गांधीत-शहरांचं भंडार आहे. साधारणतः आपण प्रत्येक शहराला तिथल्या विशेष संस्कृतीमुळे
ओळखतो, दृश्य (tangible) स्वरुपात विचार करायचा झाला तर, त्या
शहरातील लोकांचे राहणीमान, बोलीभाषा, शहराची वस्तूकला, रंगसंगती, खाण्यापिण्याच्या पद्धती इत्यादी. पण हे
सगळं जरी असलं तरी याचसोबत प्रत्येक शहारच्या ओळखीत फार महत्वाचा असणारा एक अदृश्य
(intangible) घटक म्हणजेच त्या शहराचा गंध होय. याची काही जीवंत उदाहरणे
पहायची झाली तर- मुंबई, बंगळूर, मदुराई, चेन्नई, कोलकात्ता इत्यादि अशी अनेक आहेत. मुंबई म्हटलं की समुद्र, मासे
आणि लोकलमधील घामेजलेल्या वातावरणाचा मिश्र खारट वास, तसचं
पुढे बंगळूर म्हटलं की म्हैसूर संडल सोप, सांबार आणि त्यात मिश्रित झालेला open dumps आणि IT-Parks मधून
हलका हलका येणारा सिगरेटचा गंध, मदुराई म्हटलं की रस्त्या-रस्त्याला आढळणार्या छोट्या
छोट्या मंदिरातून येणारा धुपारती आणि आगरबत्त्यांचा गंध,
चेन्नई म्हटलं की येणारा फिल्टर कॉफीचा, जॅस्मिन
फुलांचा आणि त्यात
मिसळलेल्या मालनीचर्याचा मिश्र दरवळ, कोलकत्ता म्हटलं की पुचका,
छातीम फुले, पेट्रोल आणि तळलेल्या मच्छिचा मिश्रित सुगंध...तेच दिल्ली
कडे पहिलं तर, शतपर्णीची फुले, जाळणार प्लॅस्टिक,
भाजलेल्या रोटया आणि सडणार्या जैविक कचर्याचा मिश्रितवास अशी सरळ समीकरणे आठवल्याशिवाय राहात
नाहीत आणि गमतीचा भाग म्हणजे नुसतं त्या गंधाबद्दल वाचूनच आपण त्या गंधाचा अनुभव
आणि त्या शहारच्या चित्राकृती स्वतःसमोर अगदी सहज उभ्या करू शकतो आणि म्हणूनच
प्रत्येक शहराचा सुगंध/गंध हा त्या शहराची
वेगळी अशी ओळख निर्माण होण्यामागचे महत्वाचे कारण ठरतो. शहरातील हे गंध प्रत्येक
शहराची संवेदनशील ओळख बनून त्या शहाराशी निगडीत भावनांना आकार देतात, ऐहिक
खुणा निर्माण करतात, आणि म्हणूनच हे गंध प्रत्येक शहारच्या अमूर्त ओळखीचा एक
महत्वाचा भाग ठरतात, या गंधाशी निगडीत मूर्त गोष्टी जसे की-वसाहती,
बाजार, धार्मिक संस्थांनांच्या इमारती व आवार किंवा उद्योग वसाहती
इत्यादींचे जतन व संवर्धन करणे हे ही तितकेच महत्वाचे ठरते.
Ar. श्रद्धा केळजी
Assistant Professor, TSAP, Mumbai
Comments
Post a Comment